आई-जितकी मायाळू तितकीच कणखर असते आणि हि रूपं आपण एका जवानाच्या आईमध्ये हमखास पाहू शकता.आपला मुलगा शहीद झाल्यावर होणाऱ्या आईच्या मनाची घालमेल पुढील कवितेत दर्शवली आहे.......
दारावर ठक-ठक झाली
वाटलंच पोस्त-मास्तरांची स्वारी आली,
तुझेच असणार होते पत्र
ह्यात शंका नव्हती तिळमात्र.
घाईघाईत मी उघडले दार
वाचणार होती माझ्या 'वीर'ची तार,
म्हताऱ्या डोळ्यांना नीट दिसत नव्हते काही
तुझ्या पत्र येण्यानेच प्रकाशल्या दिशा दाही.
जसे मी लागले पत्र वाचू
माझे हृदय लागले आनंदाने नाचू,
वाचताना आले डोळ्यात टचकन पाणी
पत्रात होती तुझ्या गेल्याची कहाणी.
दिला मी स्वतःला खूप धीर
म्हटलं "होता माझा मुलगा एक शूर-वीर,
माझा मुलगा शहीद झाला
म्हातारीची छाती फुलवून गेला".

पण हा धीर होता खोटा
मजसाठी हा प्रसंग नव्हता छोटा,
तुझ्या आठवणी नव्हत्या मनातून जात
प्रसंगाने केला जणू माझाच घात.
कशी-बशी सरली ती रात्र
उराजवळ होतं तुझं पत्र,
कळलंच नाही कधी झाली पहाट
उजेडात देखील होता अंधार दाट.
काही दिसांनी घरी आला तुझा मृतदेह
पाहण्याचा जवळून टाळता आला नाही मोह,
तुझ्या कुरळ्या केसांतून फिरवला मी हात
जसा तुला झोपवण्यासाठी होता फिरवला जात.
गायचे मी गाणे नेहमी तुला झोपवण्यासाठी
क्षमा कर....
येत नाही कुठलंच उठवण्यासाठी,
जेव्हा तुला नेताना सलामी होती दिली
प्रत्येक गोळीने जणू मीच होते मेली.
नंतर धरली मी वाट जी जाते घराकडे
ह्याच वाटेवरून जाताना दिले तुला आयुष्याचे धडे,
जगणार होते आता मी शूर-वीराची आई बनून
फार कमी लोकांना लाभते ते पुण्य दिले तू मला कमवून.
तू शहीद होण्याचा वाटला पुन्हा एकदा अभिमान,
अजून एक असता मुलगा तर केला असता देशावर कुरबान!!
----राहुल पाटणकर

No comments:
Post a Comment